नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यातील वेगळी घटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने राज्यातील सगळ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सूचना पाठवल्या आहेत. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज आपापल्या पंचायतींवर फडकवला जाईल याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही त्या आदेशात स्पष्ट करण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले. काश्मीरमधील जनतेनेही आपापल्या घरांवर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उभारला पाहिजे, असेही आवाहन रेड्डी यांनी केले आहे. रेड्डी म्हणाले की, तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. लोक घरांतून बाहेर पडत आहेत आणि कुठूनही कोणत्याही प्रकारच्या गडबड, गोंधळाचे वृत्त नाही.