नगर -स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्रसमर्पित एक धगधगता विचार होता हे त्यांच्या विचारातून दिसून येते. त्यांचे लिखाण, त्यांचे व्याख्यान या प्रत्येकामध्ये राष्ट्रप्रेमाने भरलेले होते. त्यांचे राष्ट्रप्रती असलेले तीव्र विचार हे संघटन आणि अखंडतेसाठी होते. देशाप्रती असलेला आदरभाव, प्रेम व आत्मसमर्पणाची भावना आपण समजून घेतली पाहिजे. त्यांच्या त्यागाची व विचारांचा आपण अंगीकार करुन देशाबद्दल अभिमान व प्रेम बाळगले पाहिजे. जीवनात प्रथम राष्ट्राला महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने चौपाटी कारंजी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, ऍड.आनंद लहामगे, विक्रम राठोड, दत्ता जाधव, मदन आढाव, शशिकांत देशमुख, परेश लोखंडे, संजय वल्लाकट्टी आदी उपस्थित होते. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, भारताच्या इतिहसामध्ये अतिशय राष्ट्रीयतेचे तत्व किती पराकोटीचे होते हे त्यांच्या कृतीतून दिसून येते. राष्ट्र संवर्धनासाठी प्रसंगी प्राणही द्यावे लागतील, याची जाणिव असूनही त्यांनी हा मार्ग स्विकारला. देशासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगून युवकांमध्ये देशप्रेम जागृत केले.