नाशिक – नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये चार दिवसांपासून कांद्याचे (Onion) लिलाव बंद असून 26 सप्टेंबरपर्यत बंद कायम राहणार आहे. कांदा (Onion) निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत.
व्यापारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लिलाव सुरू होणार नाहीत अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
सध्या कांद्याच्या मुद्यांवरुन मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाच हत्यार उपसले आहे. गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळातच कांद्याचे लिलाव ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, कांदा व्यापारी संघटनेकडून केंद्र सरकारने सुरू केलेली 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करणे,
यासह स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असलेले कर कमी करावे आदींसह वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन यापूर्वीच राज्य सरकारला पाठवले आहे, तसेच जिल्हा प्रशासना प्रशासनाला देखील दिले आहे.
बैठकीनंतरही तोडगा नाही !
नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीनंतरही तोडगा निघालेला नाही. या सर्व घडामोडींवर व्यापारी संघटनांनी बैठक घेत चर्चा केली. मात्र दोन-अडीच तास चाललेल्या या बैठकीतूनही निर्णय झाला नाही.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्याबाबत उदासीन असून निर्यातशुल्क वाढवून व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे, तो कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी होणार नाही, असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे.