नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील सुरक्षा भंगाच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. म्हैसूरच्या भाजप खासदाराच्या पासवर हे हल्लेखोर संसदेत आले होते. त्यामुळे भाजप खासदाराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातील अशी शंका त्यांना वाटत असल्यानेच ते या चर्चेतून पळ काढत आहेत, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
संसदेतील सुरक्षा भंगाचे गांभीर्य कमी लेखले जाऊ शकत नाही असे मोदींनी म्हटले होते. त्यावर चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले होते. त्याला प्रतिसाद देताना कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी हा आरोप केला आहेे.
एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत झालेल्या असामान्य घटनांबद्दल पंतप्रधानांनी अखेर आपले मौन तोडले आहे. आता ते म्हणतात की या प्रकरणच्या चौकशीची गरज आहे.
या प्रकरणावर गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी संसदेत निवेदन करण्याची गरज आहे आणि आम्ही त्यासाठी दबाव आणत राहु. तथापि पंतप्रधान अतिशय साध्या कारणास्तव चर्चेपासून दूर पळत आहेत.
लोकसभेत घुसखोरांना प्रवेश देण्याच्या म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातील, अशी भीती त्यांना वाटत असावी.