नंदूरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदूरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हातील काही भागात पावसामुळे दरडही कोसळली आहे. नंदूरबार हा आदिवासी बहुल आणि दुर्गम भागाचं प्रमाण जास्त असलेला जिल्हा आहे. येथील भागात दरड कोसळून मार्ग बंद झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेचा तडफडून अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबारमधील चांदसैली येथील ही घटना आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव सिदलीबाई आहे. पावसामुळे जेव्हा चांदसैली गावात दरड कोसळली तेव्हा या परिसरातील घाट रस्ता बंद झाला. यामुळे येथील स्थानिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी रस्त्याचा वापर करावा लागला.
यातच सिदलीबाई या आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते आजारी असतांना देखील पर्याय नसल्यामुळे त्यांना पायी रस्त्याचा वापर करावा लागला. पायी रस्त्यावर चालता येत नसल्याने शेवटी त्यांच्या पतीने त्यांना खांद्यावर घेऊन पायपीट सुरू केली. मात्र अर्ध्यावाटेतच सिदलीबाई यांनी नवऱ्याच्या खांद्यावर प्राण सोडले.
त्यावेळी त्यांच्या नवऱ्याला ना रडता येत होतं, ना आपली व्यथा कुणाला सांगता येत होती, पत्नीच्या मृत्यूनंतरही त्यांची पायपीट थांबली नाही, त्यांना बसता आलं नाही, कारण त्यांना पुन्हा घरी सिदलीबाईच्या पार्थिवासह परतायचं होतं.
दरम्यान, मुसळधार पावसात अंगाला झोंबणारा वारा, खडकाळ रस्त्यातून पाय वाट, उतार चढ ओलांडत सिदलीबाईंच्या पतीने त्यांना खांद्यावर घेऊन पायी रस्त्याच्या मार्गातून हॉस्पिटलकडे नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची ही कहाणी अधुरीच राहिली.