Nanded Hospital Tragedy – नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची मालिका अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवणारी ठरली. अशातच नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. संगीता खैरवार यांना आपल्या जुळ्या मुली गमवाव्या लागल्या आहेत.
या जन्मदात्या आईला आपल्या मुलींना ना कुशीत घेता आलं ना त्यांचा चेहरा पाहता आला. “ना मला त्यांना कुशीत घेता आलं, ना त्यांचा चेहरा पाहता आला. त्यांच्या उपचारांसाठी मी माझं मंगळसूत्र देखील विकलं, पण त्यांना वाचवू शकले नाही.” असं संगीता सांगतात.
सप्टेंबर ३० व ऑक्टोबर १ च्या दरम्यान, २४ तासांमध्ये २४ लोकांचा डॉ. शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे मृत्यू झाला होता. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश होता. आता मृतांचा आकडा ३१ इतका झाला आहे.
मनोज खैरवार व संगीता हे दाम्पत्य मनमाड येथील असून ते शेतकरी आहेत. संगीता यांना प्रसूतीसाठी २८ सप्टेंबरला देवलूर नाका परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र नवजात बाळांचे वजन कमी असल्याने त्यांना मोठ्या दवाखान्यात दाखल करण्यास सांगण्यात आलं. ( Nanded Hospital Tragedy )
नवजात बालकांना रिक्षात नेलं… । Nanded Hospital Tragedy
खैरवार दाम्पत्यास रुग्णवाहिकाही मिळाली नाही. अखेर रिक्षामधून नवजात बालकांसह ते शाम नगर येथील सार्वजनिक रुग्णालयात पोहोचले. मात्र येथे नवीन रुग्णांसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. अशात त्यांच्यापुढे डॉ. शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हा एकाच पर्याय शिल्लक होता.
दोन दिवस उपचार केल्यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजता व सकाळी ८ वाजता दोन्ही नवजात बालकांचा एकामागून एक मृत्यू झाला. खैरनार दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचा जन्मही डॉ. शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे झालेला. ‘त्यावेळी योग्य उपचार मिळत नसल्याचं लक्षात आल्याने, यावेळी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचं ठरवलेलं. मात्र आमचं नशीब आम्हाला येथेच घेऊन आलं.’ असं साश्रू नयनांनी सांगतात.
पुढे काय? । Nanded Hospital Tragedy
नांदेड व छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा अधोरेखित करतात. नेहमीप्रमाणे यावेळीही सत्ताधारी व विरोधक एकमेकांकडे बोट दाखवण्यात मश्गुल असल्याचं चित्र दिसत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकार काही ठोस उपाययोजना राबवणार का हे पाहावे लागेल.