नागपूर – केंद्र अथवा राज्य सरकारची धोरणे आणि निर्णयांना विरोध करण्यासाठी, निषेध नोंदवण्यासाठी बुद्धीवादी म्हणून गणल्या गेलेल्या साहित्यिक, कलाकार वर्गातील लोकांनी काही वर्षांपूर्वी आपल्याला मिळालेले शासकीय पुरस्कार परत करण्याची “ऍवॉर्ड वापसी’ची मोहिम उघडली होती. या मोहिमेची देशपातळीवर मोठी चर्चाही झाली होती. त्यामध्ये विशेषत: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची संख्या सर्वाधिक होती.
मात्र शासनाच्या विरोधात एकही विधान न करता, सरकारकडून आता काही नको; आजवर जे काही मिळाले आहे, त्याने समाधानी असल्याचे सांगत नागपूर येथील साहित्यिक नंदा खरे यांनी, त्यांना जाहीर झालेला साहित्य अकादमी पुरस्कार न स्वीकारण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या “उद्या’ या कादंबरीला हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
“उद्या’ ही नंदा खरे यांची भविष्याचा वेध घेणारी कादंबरी आहे. लोकसंख्येचे प्रश्न, गुंतागुंत व जगण्याच्या बिकट प्रश्नांचा वेध यात आहे. पुरस्कार वितरण समारंभ अद्याप झालेला नाही. त्यामुळे आपण हा पुरस्कार नम्रपणे नाकारत असल्याचे खरे यांनी सांगितले आहे. एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना खरे म्हणाले की, चार वर्षांपूर्वी मी कोणाकडूनही कोणताही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे. चाहत्यांच प्रेमही मिळालं आहे. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून, आभार मानून ही भूमिका मी मांडत आहे. गेली चार वर्षे लोकांना मी पुरस्कारसाठी “नाही’ म्हणत आलो. आता हो म्हटले असते तर त्यांचा अपमान झाला असता. म्हणून पुरस्कार नाकारत असल्याचे खरे यांनी सांगितले.