कोल्हापूर – नरेंद्र मोदी हे भाजपाचेच पंतप्रधान आहेत, देशाचे नाहीत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केले आहे. कोल्हापूरीत उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पटोले शहरात आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केले आहे.
नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने निषेध केला. काही लोकांनी, विरोधकांनी सांगितले की हे गृहविभागाचे, गुप्तचर विभागाचे अपयश आहे. आम्ही एसटी कामगारांना आमचं मानतोय, हे आमचे लोक आहे. जेव्हा तीन काळ्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालले, तेव्हा देशाचे पंतप्रधान, भाजपाचे पंतप्रधान…त्यांना भाजपाचेच पंतप्रधान म्हणावे कारण ते भाजपाचेच आहेत, देशाचे पंतप्रधान नाहीत. त्यांनी काय केलं की लोकसभेत त्यांनी आंदोलनजीवी, आतंकवादी म्हणाले. शेतकऱ्यांविषयी, देशाच्या अन्नदात्याविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची हिंमत कशी झाली, हाही प्रश्न तिथे निर्माण झाला.
एसटी कामगार आमचे बंधू भगिनी आहे. त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका आम्ही कायमच मांडली. जे काही न्यायालय निर्णय देईल, त्याप्रमाणे शासन निर्णय घेईल या पद्धतीची भूमिका पण त्यांच्यासमोर मांडली. पण भाजपाने फूस लावून…स्वतःची सत्ता असताना त्यांच्याच वित्तमंत्र्यांनी काय म्हटलं होतं हे सगळ्या जनतेपर्यंत पोहोचलं होतं. राज्यातल्या जनतेला दळणवळणापासून दूर ठेवणं, राज्यात अस्थिरता निर्माण करणं हा भाजपाने पहाटेची सत्ता गेल्यानंतर जो गोरखधंदा सुरू केला आहे, त्याचे परिणाम राज्याच्या जनतेला भोगावे लागत आहेत. आणि एसटी कर्मचाऱ्यांना फूस लावून ज्याप्रमाणे शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला, या हल्ल्याची चौकशी सुरू आहे. बोलवता धनी कोण हे पुढच्या काळात निश्चित समोर येईल. असेही यावेळी पटोले म्हणाले आहेत.