मुंबई – “राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे “मेजर ध्यानचंद खेलरत्न’ असे नामकरण करणे ही लोकभावना नाही. हा तर केंद्रातील सरकारचा राजकीय “खेळ’ म्हणावा लागेल. स्व. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा व संस्कृती गमावली आहे, अशी खंत शिवसेनेच्या मुखपत्रातून व्यक्त करत मोदी सरकार निशाणा साधण्यात आला.
सध्या देशाचे वातावरण खेळमय झाले आहे. एरव्ही ते क्रिकेटमय झालेले दिसते. टोकियो ऑलिम्पिकमुळे देशात इतर खेळांवर उत्साहाने चर्चा होत असताना निरज चोप्राने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण क्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत.
गेल्या सत्तर वर्षांत कॉंग्रेसच्या सरकारने, नेहरू, गांधी, राव, मनमोहन, मोरारजी, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर यांनी जे काही केले ते सर्व धुवून आणि पुसून टाकायचे, असे कुणाचे राष्ट्रीय धोरण किंवा राज्य चालवायची भूमिका असेल, तर कपाळ पहडून उपयोग नाही. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल.
ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान केले जातात. मेजर ध्यानचंद व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठेच आहे. ते एक उत्तम माणूस होते व पंडित नेहरुंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे मेजर ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असे मानता येत नाही.
राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेषाचे राजकारण आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती.