पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलच्या मालकाच्या खूनप्रकरणातील अटक केलेल्या दहा गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ही 42 वी कारवाई आहे.
बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56), निखिल खेडेकर (वय 24), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय 21, तिघेही रा. उरुळी कांचन, ता. हवेली), अक्षय दाभाडे (वय 27, रा. सोरतापवाडी), करण विजय खडसे (रा. सहजपूर, ता. दौंड), प्रथमेश कोलते (वय 23, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), गणेश मधुकर माने (वय 20 रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली), निखिल चौधरी (वय 20, रा. कोरेगाव मूळ), निलेश आरते (वय. 23, हडपसर, पुणे), काजल कोकणे (वय 19 रा. इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), असे मोक्का लावलेल्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (दि.18) जुलै रात्री उरुळीकांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे (रा. जावजीबुवाची वाडी, ता. दौंड) यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. दोन अनोळखी इसमांनी आखाडे यांच्यावर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले होते. आखाडे यांचा उपचारादरम्यान (दि.21) जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.
तपासादरम्यान हा गुन्हा बाळासाहेब खेडेकर यांनी त्यांच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने तसेच व्यवसायातील स्पर्धेतून त्यांचा भाचा सौरभ ऊर्फ चिम्या व इतरांना दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे सांगून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. यात दहाजणांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृहात आहेत. तसेच एक विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
हे सर्वजण टोळी वर्चस्वासाठी संघटित गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी निलेश आरते याच्यावर यापूर्वी हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केली