राहुरी – तालुक्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतः पुढाकार घेऊन लाभ मिळवून देण्याचा राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे. सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा आधार आहे. त्यामुळे शासनाने उत्पन्न मर्यादेत वाढ केली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
राहुरी येथे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी सुमारे ६५ विद्यार्थ्यांना तसेच इतर मिळून सुमारे २७२ लाभार्थ्यांना प्रकरण मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले. यावेळी माजी आ.कर्डिले बोलत होते. राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विनित धसाळ, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, राहुरी तालुका भाजपा अध्यक्ष सुरेशराव बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, नानासाहेब गागरे, चांगदेव भोंगळ आदी उपस्थित होते.
भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर म्हणाले की, तालुक्यात समितीच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. परंतु गरजू व्यक्तींपर्यंत आपण पोहोचणे आवश्यक आहे. योजनेचे अध्यक्ष विनित धसाळ यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, समितीच्या पुढाकाराने तालुक्यातील ३०० दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आज सुमारे ७५ विद्यार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही एजंट अथवा त्रयस्थ व्यक्तीकडे प्रकरण अथवा पैसे दूर नये तर सेतुमध्ये प्रकरण जमा करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पात्र लाभार्थींना मंजुरी पत्र देण्यात आले.
तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी योजनेची माहिती दिली. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी समिती सदस्य नारायण धनवट, संदीप आढाव, दीपक वाबळे, अजित डावखर, गोरख अडसुरे, किरण ससाणे, उत्तमराव खुळे, अविनाश बाचकर, भैय्यासाहेब शेळके, सुजय काळे, मनोज गव्हाणे, संजय गांधी शाखेचे संजय वाघ, नंदा मकासरे, भारत जरे, मंगेश साठे, विशेष तज्ज्ञ नितीन शिंदे, किशोर खेमनर, नवनाथ चेमटे, सारिका सगळगिळे, सीमा शेलार आदींसह तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते.