हिंजवडी, {रमेश ससार} – वाकड येथील प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 26 मध्ये महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युतपुरवठा व विद्युत पंप बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे पाच सहा वर्षे उलटूनही कोट्यवधी रुपयांची ही कामे किरकोळ कामामुळे अपूर्ण राहिल्याने येथून पाणीपुरवठा होत नाही.
परिणामी ऐन उन्हाळ्यात प्रत्येक सोसायटीला दिवसाला आठ ते दहा टँकर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांचा टॅक्स भरणार्या वाकडकरांची तहान केव्हा भागविणार, असा सवाल येथील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रभाग क्रमांक 26 मध्ये काळेवाडी फाट्याजवळ कावेरीनगर परिसरात सव्वाचार कोटींच्या निधीतून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अनेक वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकाम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराला किती दिवसाचा कालावधी दिला आहे किंवा ते काम किती दिवसात पूर्ण होईल? असा सवाल रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकड येथील प्रभाग क्रमांक 25 मध्ये इंदिरा इंटरनॅशनल स्कूल जवळ तसेच प्रभाग क्रमांक 26 मध्ये देखील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम कोविडच्या अगोदरपासून सुरू आहे. ही दोन्ही बांधकामे रखडल्यामुळे वाकड व परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभागात काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
वाकड, पिंपळे निलख, विशालनगर, कावेरीनगर, कस्पटे वस्ती हा भाग झपाट्याने विकसित होत असल्या कारणामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर स्वरूपात उत्पन्न मिळते. परंतु आज ऐन उन्हाळ्यात प्रत्येक सोसायटीला महिनाकाठी तीनशे ते चारशे टँकर घ्यावे लागत असल्याने सोसायटीधारकासह स्थानिक वाकडकर नागरीकही त्रस्त झाले आहेत.
त्यामुळे आपण नागरिकांची पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन तातडीने पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करून नागरिकांना पाणीटंचाईतून मुक्त करावे, अशी मागणी कलाटे यांनी आयुक्त शेखर सिह यांच्याकडे केली आहे.
टाक्यांच्या या रेंगाळलेल्या कामाबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अमरजीत म्हस्के यांना विचारणा केली असता ते म्हणाले, सन 2018/19 पासून ही कामे सुरू आहेत. परंतु संबंधित कंत्राटदाराने वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. त्यामुळे त्याला दंड ही ठोठावला आहे. विद्युतपुरवठा मधील काही तांत्रिक अडचणीमुळे आता टेस्टिंग करणे बाकी आहे. परंतु महिनाभराच्या आतमध्ये कावेरीनगर भागातील टाकीमधून पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आम्ही प्रत्येक सोसायटीत दिवसाला दहा ते बारा टँकर पाणी विकत घेतो. यावर्षी टँकर संघटनांनी दर वाढविल्याने दिवसाला 15 हजार रुपये प्रमाणे महिन्याला चार ते साडेचार लाख रुपये प्रत्येक सोसायटीला मोजावे लागतात. आशा पाच हजारांहून अधिक सोसायटी या भागात आहेत.
याची आर्थिक तुलना करा. पाण्याच्या टंचाईमुळे पाण्याचे नियोजन व बजेट लोकांच्या खिशाना परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने शहराचा पाणी प्रश्न गांभीर्याने हाताळला पाहिजे. – सचिन आगरवाल, सेक्रेटरी, पेटल्स सोसायटी वाकड.
वाकड परिसरात लोकांना चांगले रस्ते, आरोग्यासाठी सुविधा जशा दिल्या जातात. त्याचप्रमाणे पाणी हा जीवनावश्यक घटक आहे. अनेक ठिकाणी महिला पाण्याच्या समस्यांबाबत विचारणा करत असल्याने महापालिकेने गांभीर्याने हा विषय घेऊन वाकड परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा व भीषण पाणी टंचाईतून मुक्त करावे. – स्नेहा कलाटे, अध्यक्षा रणजित आबा कलाटे फाउंडेशन.