मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसानंतर शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला आणि शहरात दुपारपर्यंत केवळ अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. तथापि हवामान विभागाने मात्र शहरात पुन्हा मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईला पिण्यायोग्य पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमधील एकूण पाणीसाठा आता 68 टक्क्यांवर पोहोचला आहे. या सात तलावांपैकी चार तलाव आतापर्यंत ओव्हरफ्लो झाले आहेत.
पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे महानगरात कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची नोंद नाही. पूर्व तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. इस्टर्न फ्रीवेवर मात्र सुरळीत वाहतूक सुरू होती. नवी मुंबईतील उरण फाटा येथे केमिकलचा टॅंकर पलटी झाल्याने सायन-पनवेल महामार्गावर सकाळी वाहतूक कोंडी झाल्याचे शहर वाहतूक पोलिसांनी सांगितले.
“सकाळी पावसाची तीव्रता कमी झाल्याने शहरात कुठेही पाणी साचले नाही. शहराच्या बहुतांश भागात अधूनमधून मुसळधार पावसासह हलका पाऊस पडत आहे.पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत अनुक्रमे 100.82 मिमी, आणि 129.12 मिमी सरासरी पाऊस पडला.
बीएमसीने गुरुवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, शुक्रवारी सर्व शासकीय व खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालये सुरू ठेवण्यात आली. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी जाहीर केली गेली नाही कारण हवामान खात्याने पावसाचा केवळ यलो ऍलार्ट जाहीर केला होता. 28 जुलै रोजी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करणारे बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसामुळे माटुंगा, डीएन नगर, भायखळा, ट्रॉम्बे, आझाद मैदान, कांदिवली, काळबादेवी, ओशिवरा, दहिसर, मागाठाणे या भागात गुरुवारी पाणी साचले होते, बहुतांश भागात जवळपास अर्धा फूट पाणी साचले होते.