मुंबई – नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या 229 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.
त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठेही गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात वाढ झाली. मागील वर्षी जवळपास 156 जणांवर कारवाई करण्यात आली होती.
नवीन वर्षी झारखंड मध्ये मोठा अपघात
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये अपघाताची मोठी घटना घडली आहे. थर्टी फर्स्टची पार्टी आटोपून घरी येणाऱ्या सहा मित्रांचा विचित्र रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. बिष्टुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाऊस एरिया परिसरातील गोल चक्कर येथे ही दुर्देवी घटना घडली आहे.
हे सहाही मित्र पार्टी आटोपून येत होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हाडरवर जाऊन आदळली. त्यानंतर ही कार झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत कारमधील सहाही तरुणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, अपघाताचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आल्याचे स्थानिकांनी सांगितले. आवाज ऐकताच घरातून लोक बाहेर पडले आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटले होते.