शारजा – कर्णधार रोहित शर्माची दुखापत हे मोठे आव्हान असले तरीही मुंबई इंडियन्सने त्याच्या गैरहजेरीत सातत्याने विजय प्राप्त केले आहेत. केवळ रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असली तरी त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित झाल्यामुळे आजचा सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी केवळ सराव ठरणार आहे.
प्ले-ऑफमध्ये त्यांना सरस कामगिरी करण्यासाठी या सामन्यातील सराव लाभदायक ठरणार आहे. बदली कर्णधार कॅरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कॉन्ट डीकॉक व इशान किशन यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरीही सेकंड बेंचमधील नव्या गुणवत्तेला आजच्या सामन्यात संधी मिळण्याचीही शक्यता आहे. पुढील सर्व महत्त्वाच्या सामन्यांमध्ये या बड्या खेळाडूंपैकी एखाद्याला दुखापत झाली तर सामन्याचा सराव असणे महत्त्वाचे असल्याने नवोदितांना या सामन्यात खेळवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तगडे खेळाडू तसेच नवोदित खेळाडू यांना रोखायचे हेच आव्हान हैदराबादसमोंर राहणार आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या हैदराबाद संघाकडे सलामीच्या जोडीचा तसेच मधल्या फळीत सरस फलंदाज नसल्याने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जॉनी बेअरस्टो याने कर्णधार वॉर्नरच्या साथीत संघाला काही सामन्यात चांगली सुरुवात करून दिली असली तरीही त्याच्या कामगिरीत सातत्याचा आभावही पाहायला मिळाला आहे. यंदाच्या स्पर्धेत वॉर्नरनेच संघाचा मुख्य भार उचलला आहे. मनीष पांडेने देखील काही लढतींमध्ये आपल्या फलंदाजीने संघाचे विजय साकार केले असले तरीही तो देखील मोक्याच्या क्षणी विनाकारण आक्रमक फटके मारुन बाद होत आला आहे. त्यामुळे त्याच्यासह प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा व विजय शंकर यांना अत्यंत जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
बुमराहच्या यॉर्कर्सचे आव्हान
या मैदानाच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचे जरी वर्चस्व राहिले असले तरीही कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी होत असलेला जसप्रीत बुमराह हैदराबादची डोकेदुखी ठरेल. त्याचे वेगवान यॉर्कर्स कसे खेळून काढायचे यासाठी हैदराबादच्या फलंदाजांना इनसाईड आऊट स्टान्स घेत फलंदाजी करावी लागेल. याच पद्धतीने फलंदाजी करून अनेक फलंदाजांनी बुमराहवरही वर्चस्व राखले आहे. या सामन्यात बुमराहवर दडपण टाकण्यासाठी डावाच्या सुरूवातीलाच वॉर्नरला त्याच्यावर आक्रमण करावे लागेल.
मुंबईची अत्यंत अव्वल गोलंदाजी पाहता हैदराबादचे फलंदाज त्यांच्यासमोर कशी कामगिरी करतात यावरच त्यांचे यश अवलंबून राहमार आहे. हा सामना जिंकला तरीही हैदराबादचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आल्याने त्यांना काहीही लाभ होणार नाही. मात्र, जर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला तर मग प्ले-ऑफमध्ये त्यांना एलिमिनेटरऐवजी क्वालिफायर सामना खेळावा लागेल. ते टाळण्यासाठी मुंबई जीवाचे रान करून सामना जिंकण्यासाठी खेळेल यात शंका नाही. अर्थात त्यांना फिरकी गोलंदाज रशिद खान याचा समर्थपणे सामना करावा लागणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत हैदराबादकडून तोच सर्वात जास्त यशस्वी गोलंदाजी ठरला आहे.
मुंबईच्या बलाढ्य फलंदाजीला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या गोलंदाजांना प्रत्नांची पराकाष्टा करावी लागेल. त्याचबरोबर हैदराबादच्या मर्यादित फलंदाजीवर जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिंन्सन, राहुल चहर, पंड्या, पोलार्ड ही विविधता असलेली गोलंदाजी अंकुश राखण्याचाही प्रयत्न करेल. हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला बाद करण्यात यश मिळाले तर त्यांची फलंदाजी त्याच्यापासून त्याच्या पर्यंतच आहे हे देखील पुन्हा एकदा सिद्ध होईल.