मुंबई – मुंबईतल्या भुलेश्वर परिसरात एका सोन्याच्या दुकानात 8 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी करून राजस्थानला पळून गेलेल्या 10 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खुशाल टामका यांच्या दुकानात ही सोन्याची चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही पोलिसांना मिळू नये म्हणून सीसीटीव्हीचा डिव्हीआरही पळवून नेला होता. एलटी मार्ग पोलिसांनी 6 वेगवेगळी पथके तयार करून तपासाला सुरुवात केली. त्यावेळी हे चोरटे भुलेश्वर ते बोरीवली ओलाने गेले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एका खाजगी इनोव्हा गाडीच्या माध्यमातून राजस्थानपर्यंतचा प्रवास त्यांनी केला होता.
सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. एलटी मार्ग पोलिसांनी या गुन्ह्याचा कमी वेळात उलगडा करून 10 आरोपींना अटक केली आणि चोरीला गेलेला 90 टक्के मुद्देमालही परत मिळवला.
सोने व्यापारी टामका यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामागारानेच या चोरीचा कट रचला आणि मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीनी हे सोने राजस्थानमधल्या सिरोहीमध्ये नेऊन शेतात 6 फूट खोल खड्ड्यात पूरून ठेवले होते. मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर ते परत मिळवण्यात यश आले. सुरुवातीला या चोरीच्या गुन्ह्यात फक्त 4 आरोपींचा सहभाग होता.