औरंगाबाद – राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. ते सिल्लोड येथे बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच युतीसाठी पुढाकार घेवू शकतात, असे सत्तार यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी सेना आणि भाजपमधील युतीचा पुल बांधू शकतात. दोन व्यक्तींची मन जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यासंदर्भात निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
नितीन गडकरी हा माणूस गेल्या तीस वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केले आहे. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात आणि मनही जुळवू शकतात, असे सत्तार यांनी म्हटले आहे. तसेच मी कालही तेच विधान केले होते आणि आजही तेच विधान करत आहे, अशी आठवण अब्दुल सत्तार यांनी करून दिली.
दरम्यान, युवासेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड येथे दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिल्लोड नगरपरिषदेच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.