नवी दिल्ली – विविध कारणामुळे अचानक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातील कारभार बंद करतात. अशा वेळी वितरकांचे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये म्हणून एखादी व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहान फेडरेशन ऑफ आटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने केंद्र सरकारला केले आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्या अचानक निघून गेल्यावर त्याचा फक्त वितराकांवरच परिणाम होत नाही तर देशाच्या ब्रॅंडवर परिणाम होतो. वाहन वितरकांच्या परिषदेत बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, केंद्र सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशामध्ये उत्पादन करण्याची परवानगी देते. त्यांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर या कंपन्या देशात डीलरची नियुक्ती करतात. मात्र अनेकदा काही अडचणींमुळे या कंपन्या निघून जातात. त्यामुळे वितरकांवर तर परिणाम होतोच परंतु या वितरकाकडून घेतलेल्या वस्तूंच्या देखभालीचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
अशा बाबी अनेक वेळा झाल्या आहेत. त्यामुळे याचा वितरकांवर आणि ग्राहकावर होणारा परिणाम टाळण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेतील दोन मोठ्या कंपन्यांनी भारतातील कामकाज बंद केले आहे. या कंपन्यांच्या वितरणाचे काम करण्यासाठी देशातील वितरक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मात्र हे काम आचानक बंद झाल्यानंतर त्यांची ही गुंतवणूक वाया जाते. त्याचबरोबर त्यांना नवा उद्योग सुरू करण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात असे त्यांनी सांगितले.