नवी दिल्ली (प्रतिनिधी) – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांचा कार्यकाळ उद्या 7 जुलै रोजी संपत आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाकडून मुख्तार अब्बास नक्वी यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनविले जाऊ शकते, अशी चर्चा जोरात असतानाच त्यांनी राजीनामा दिला आहे. नक्वी यांचा राज्यसभेचे खासदार म्हणून उद्या गुरुवार शेवटचा दिवस आहे.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी अलीकडेच झालेल्या निवडणुकीत भाजपने नक्वी यांना उमेदवारी दिली नव्हती. यानंतर त्यांना रामपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरविले जाईल, अशी चर्चा होती; परंतु पक्षाने दुसऱ्यांना मैदानात उतरविले. नक्वी यांचा उद्या शेवटचा दिवस आहे. अशात त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री आरसीपी सिंग हे सुद्धा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. सिंग हे जेडीयूच्या कोट्यातून मंत्री आहेत. महत्त्वाचे म्हणजे नक्वी राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत मंत्री म्हणून काम करू शकतात; परंतु असे क्वचितच होते. मंत्री बनविल्यानंतर मात्र खासदार बनविले जातात. नक्वी यांच्या नावाची चर्चा उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारापासून ते राज्यपाल बनविण्यापर्यंत सुरू आहे. जेडीयूने राज्यसभा नाकारल्यानंतर आरसीपी सिंग भाजपात येऊ शकतात, अशी चर्चा आहे.