ढाका – बांगलादेशात आलेल्या पूरात गेल्या 24 तासात आणखीन 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 मे पासून आतापर्यंत मरण पावणाऱ्यांची संख्या 110 झाली आहे. बांगलादेशात गेल्या 122 वर्षातील सर्वात भीषण पूराचे थैमान सध्या सुरू आहे. आतापर्यंत मरण पावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक 57 मृत्यू सेल्हेट जिल्ह्यात झाले आहेत. मयमनसिंग, रंगपूर, ढाका विभागात अनुक्रमे 40,12 आणि एका मृत्यूची नोंद झाली आहे.
या पूराचा फटका किमान 13 हजार लोकांना बसला आहे. देशभरातील 70 तालुक्यांमध्ये पूर आला आहे. त्यापैकी 33 तालुके सेल्हेटमधील, 16 रंगपूर जिल्ह्यातील, 20 मयमनसिंग, आणि एक चिच्चगॉंग जिल्ह्यातील आहे. पूरामुले हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. पूरग्रस्तांसाठी देशभरात 1,944 आश्रय छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मरण पावणाऱ्यांपैकी 75 जणांचा मृत्यू पूराच्या पाण्यात बुडाल्याने झाला आहे. 15 जण अंगावर वीज पडल्यामुळे तर दोघांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला आहे. एकजण पावसामुळे अतिसार झाल्याने मरण पावला. तर 9 जण अन्य कारणांमुळे मरण पावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूरामुले घरे, शेतजमीन, रस्ते आणि महामार्गांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे बांगलादेशचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन राज्यमंत्री मोहम्मद इनामूर रेहमान यांनी सांगितले.