मुंबई – एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून नव्या अभ्यासक्रमाबाबत आंदोलन छेडले होते. नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली असून सुधारित परीक्षा पद्धत अन् अभ्यासक्रम 2025 पासूनच लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने एमपीएससीला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने ट्वीट करून माहिती दिली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले.
पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन होते. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत राज्य सरकारने नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. सरकारने आश्वासन देऊनही आदेश न काढल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनाची भेट घेत दखल घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आयोगाला दुस-यांदा पत्र लिहित नवीन अभ्यासक्रम 2025पासून लागू करण्याची मागणी केली होती. ही मागणी आयोगाकडून मान्य करण्यात आल्याने एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे.