सातारा – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चर यांच्यावतीने सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा विकास मंच स्थापन करण्यात येणार असून सातारा शहरामध्ये याचे लवकरच अद्ययावत स्वरूपाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या मंचच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकतेला वाव देणे आणि नवीन उद्योजकांना समोर आणणे हा यामागचा हेतू आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम उपस्थित होते. गांधी म्हणाले, “”जिल्ह्यामध्ये व्यवसाय, पर्यावरण, पर्यटन आणि उद्योगांना प्रचंड वाव आहे. पुण्यापासून असणारे दोन तासांचे अंतर, महामार्गाशी सानिध्य जमीन आणि मनुष्यबळाची उपलब्धता यामुळे येथे उद्योगविस्तारण्यास वाव आहे. सातारा शहर आणि जिल्ह्यातील अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांची यासंदर्भात नुकतीच चर्चा झाली आहे. त्यामध्ये तंत्रप्रधान व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञान पार्क यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्यास अन्न प्रक्रिया उद्योग याला उत्तेजन दिले गेल्यास साताऱ्यामध्ये रोजगाराला मोठी संधी आहे.” या गरजा जाणून पहिल्या बैठकीमध्ये जिल्हा विकास मंच स्थापन करण्याचा निर्णय झाल्याचे गांधी यांनी सांगितले.
या मंचमध्ये जिल्ह्यातील व्यावसायिकांची कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना शोधणे, त्यांचे उद्योग प्रकल्प तयार करणे, त्यांना कर्जविषयक सुविधा उपलब्ध करून देणे, नवीन व्यवसाय आणि विकासाच्या संधी शोधणे यांसारख्या मार्गदर्शनपर सुविधा या मंचच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांसाठी देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सातारा जिल्ह्यात अडीचशे एकर जागा उपलब्ध झाली तर येथे इलेक्ट्रॉनिक पार्कसुद्धा तयार करण्यासाठी संधी आहे.
याशिवाय ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या बड्या जागतिक कंपन्यांचे ऑनलाइन मार्केटिंगचे अतिक्रमण जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच रिटेलर व विक्रेत्यांवर होत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही आत्मनिर्भर ऍप तयार करत असून त्याची आता सध्या चाचणी सुरू आहे. ते ऍप सर्वांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रामधील उद्योजकांची बांधणी सुरू
राज्य शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय, पर्यटन विस्तारीकरणासंदर्भातील धोरण लवचिक आणि व्यवसायभिमुख बनवावे, याकरिता पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची मोठी बांधणी सुरू आहे. येथील औद्योगिक वसाहतीच्या विविध सुविधांसाठी राज्य शासनाकडे निश्चित पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे ललित गांधी यांनी स्पष्ट केले.