पौड -मुळशीत वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच व्यवसायावर देखील परिणाम होत आहे. वीजपुरवठा सारखाच खंडित होण्याने नागरिकांना जी अडचण निर्माण होत आहे, ती सोडवण्याची त्रस्त नागरिक मागणी करीत आहेत.
मुळशीत पिरंगुट भागात उद्योगीकरण जोरात झाले आहेत. शेकडो कंपन्या या परिसरात कार्यरत असून विजेची मागणी देखील मोठी आहे; पण खंडित वीज सेवेमुळे त्यांच्यावर देखील परिणाम होत आहे, त्यामुळे नागरिकांसह कंपन्यांचेही नुकसान होत आहेत.
या बाबतीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, वीज पुरवठा होणाऱ्या वाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड होतो,काहीवेळा पक्षी मरून पडतात, वायर तुटते, कंडक्टर तुटतात, त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो.
जुनाट तारा, म्हणूनच घात होतोय सारा
सातत्याने लाईट जाण्यामागे जुनाट विद्यतुप्रवाह संच जबाबदार आहेत. जुन्या तारा, जुने कंडक्टर, जुन्या डीपी, जुने पोल या गोष्टींमुळे थोड्याशा वाऱ्याने किंवा पावसाने पण वायर तुटणे, शॉर्ट होणे, कंडक्टर जळणे असे प्रकार घडत असतात. 50 वर्षांहून अधिक काळ जुन्या वायरी विद्युतप्रवाहासाठी वापरल्या जातात, त्या बदलण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच वीजपुरवठा खंडित होत आहे. याकडे गंभीरतेने पाहून या गोष्टी नवीन पुरवल्या गेल्या पाहिजेत तरच सुरळीत वीजपुरवठा होऊ शकतो.
याबाबतीत खबरदारी घेण्यासाठी योग्य त्या सूचना देऊन अखंडित वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न केले जातील.
– फुलचंद फड, महावितरण अधिकारी
मुळशीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊन शेती, पोल्ट्री, पॉलिहाऊस, तसेच इतर व्यवसाय तसेच घरातील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे तरी याची दाखल लवकरात लवकर घ्यावी.
– सोपान निबुदे, पुणे जिल्हा अध्यक्ष, भाजप सहकार आघाडी