उत्तम पिंगळे
परवा प्राध्यापकांकडे गेलो असता ते तावातावात कोणाशी तरी बोलत होते. मला पाहताच म्हणाले या… या… बसा. थोडा वेळ बसल्यावर मला म्हणाले की, कोणत्याही विरोधात होणारी आंदोलने ही अलीकडे हिंसक वळण घेत आहेत आणि हे योग्य नाही. आता आपण पाहात आहोत की, संसदेने नागरिक कायदा विधेयक संमत केल्यावर देशात विविध ठिकाणी विरोध व हिंसक आंदोलने होत आहेत व यावर आता उपाय तातडीनं करण्याची गरज आहे.
मग सर पुढे म्हणाले, कोणताही विचार न करता कोणाच्यातरी आशीर्वादाने असे आंदोलन होत आहेत हे नक्की. परवा आंदोलनकर्ते नव्या कोऱ्या रेल्वेगाडीच्या काचा फोडत होते तसेच फलाटावर बसण्यासाठीच्या बाकड्यांना घेऊन रुळावर फेकत होते. तेथेही अनेक वाहिन्यांचे वार्ताहार होते. त्यांनी काही आंदोलकांना बाजूला घेऊन विचारले की, हे आंदोलन कशा करता करत आहात तर बहुतेक जणांना नेमका विषय काय ते काहीच सांगता येत नव्हते. आंदोलनकर्त्यांमध्ये अगदी दहा बारा वर्षांच्या मुलांपासून अनेक लोक होते जे दगडफेक व तोडफोड करत होते. एकीकडे आपण अहिंसेने स्वातंत्र्य मिळवल्याच्या गोष्टी करतो मग आता परिस्थिती बिघडत का आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.
अशामुळे रोजचे जगणे कठीण होत आहे. बाहेर तोडफोड, जाळपोळ होत असेल तर नोकरदारांना आपल्या कामाच्या ठिकाणी व विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण होते. अत्यावश्यक सेवा जसे रुग्णवाहिका व अग्निशमनच्या गाड्यांवरही या तोडफोडीचा परिणाम होतो. कारण एकदा तोडफोड सुरू झाली की ते पुढे मागे पाहत नाही. कित्येक राजकीय नेते व समाजकंटकांची फूस असते व भाडोत्री कार्यकर्ते घेऊन हा जमाव बनवून आणतात. यावर आता कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणताही कायदा किंवा नियमांचा विरोध करण्याचे अनेक प्रकार आहेत. अगदी मुकमोर्चापासून न्यायालयीन लढाई पर्यंतही जाऊ शकतो. कायद्याच्या कसोटीवर या नियमांची तपासणी होऊ शकते. मग हा हिंसाचार कशासाठी? असा हिंसाचार घडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे. यामध्ये सरकारी मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. त्यात मुख्यत: सार्वजनिक वाहने व सरकारी संपत्ती यांचा समावेश होतो.
आता हा पैसा टॅक्स पेअरचा असतो म्हणजे मध्यम वर्ग व करदात्यांकडून घेतलेल्या पैशाचा असा नाश होतो. अशा हिंसक आंदोलनास जबाबदार असलेल्या गटांना व पक्षांना जबर शिक्षा करून त्यांच्याकडून पूर्ण संपत्तीची नुकसान भरपाई व जबर दंड होणे आवश्यक आहे ज्यामुळे कायद्याची जरब बसेल. मागे मुंबईत मेट्रो विरोधातही आंदोलनात बांधकाम उपकरणांची व गाड्यांची तोडफोड झाली. आता या वस्तू ठेकेदाराच्या असतात व त्याच्याकडे कित्येक लोक रोजगारावर असतात. अशी यंत्रे खराब झाल्यावर त्यावर काम करणाऱ्यांचा रोजगारही जातो. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलन करण्याकरता पेड कार्यकर्ते आणली जातात. याचाच अर्थ आपल्याकडे प्रचंड बेराजगार आहेत. कामधंदा व नोकरी करणारी व्यक्ती अशा फंदात पडत नाही. म्हणूनच रोजगार निर्मिती महत्त्वाची ठरते. तसे नसले की मग जो तो बेरोजगार मिळेल ते काम व कधी कधी अशाही तोडफोडीत नाईलाजाने सहभागी होतो. कारण त्यांचा दिवस भरतो. म्हणूनच नवनवीन उद्योगधंदे रोजगार निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर भविष्यात अशी आंदोलने अधिक हिंसक बनून जातील याची नोंद घेणे इष्ट ठरेल.