निमोणे – मोटेवाडी (ता. शिरूर) येथील पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला असून या तलावातील पाण्याची पातळी शून्य टक्के एवढी झाली आहे. या तलावात केवळ 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असून त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवणार असल्याचे येथील माजी उपसरपंच कार्यकर्ते संदीप येलभर यांनी सांगितले.
मोटेवाडी येथील पाझर तलावाच्या पाण्यावर करडे, चव्हाणवाडी, लंघेवाडी येथील शेतकरी अवलंबून आहेत. सध्या सगळीकडे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांपेक्षा भाजीपाला उत्पादनावर जास्त जोर दिला आहे. त्यामुळे तलावातील पाणी संपल्यानंतर शेतकऱ्यांना हा भाजीपाला कसा जगवायचा असा प्रश्न पडला आहे.
तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागा सुद्धा या तलावावर अवलंबून आहेत. त्यामुळे या पाझर तलावात लवकरात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मोटेवाडीचे सरपंच सुरेश कोल्हे यांनी दैनिक प्रभातशी केली आहे.