श्रीनगर: काश्मीर खोऱ्यातील बहुतांशी निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. तथापी बहुतांशी भागातील दुकाने, संस्था आणि रस्त्यावरील वाहतूक बंदच असल्याने तेथील जनजीवन अजून पुर्व पदावर आलेले नाही. काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत राहण्याचा आजचा 27 वा दिवस होता. खोऱ्यातील निर्बंध शिथील केले जात असले तरी कायदा आणि सुव्यवस्था स्थिती कायम ठेवण्यासाठी तेथील सुरक्षा बंदोबस्त मात्र कायमच राहणार आहे.
लोकांना शहर किंवा आपल्या परिसरात वावरणे सुलभ व्हावे म्हणून विविध ठिकाणी उभारण्यात आलेली बॅरिकेट्स काढून टाकण्यात आली आहेत. काल शुक्रवार असल्याने सामुहिक नमाज पठणानंतर हिंसक प्रकार घडू नयेत म्हणून काल पुन्हा खोऱ्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. केवळ ऍम्ब्युलन्स किंवा आपत्कालिन सेवेतील वाहनेच रस्त्यावरून जाण्यास अनुमती देण्यात आली होती. तथापी काल बहुतांशी शांतता कायम राहिली. बहुतांशी शाळांमध्ये अजूनही विद्यार्थी जाताना दिसत नाहीत. या भागातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहे.