बारामती वनविभागाकडून दुजोरा : पिंजरा लावण्यासाठी अधिकाऱ्यांची सतर्कता
भवानीनगर -बारामती तालुक्यात बिबट्याचे हल्ले गेल्या चार दिवसांत रोजच होत आहेत. कन्हेरी, काटेवाडी, ढेकळवाडी भागातही बिबट्याने हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या भागात एकापेक्षा जास्त बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता अतिरिक्त वन अधिकारी राहुल काळे यांनी वर्तविली आहे. बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी वनविभाग सरसावला आहे.
बारामती आणि इंदापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. तसेच बिबट्याचे हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल बारामती वन विभागाने तातडीने घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. काटेवाडी, कन्हेरी, ढेकळवाडी भागातील नागरिक भयभीत झाले आहेत.
रात्री-अपरात्री किंवा पहाटे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे कठीण झालेले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थ बिबट्याच्या हल्ल्यामुळे घाबरून गेले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यातून शेळी, मेंढी, कुत्रा आदी प्राण्यांवर हल्ला करीत आहेत.
बारामती तालुक्यात यापूर्वी बिबट्याचे हल्ले कधी घडले नाहीत.
मात्र, दौंड तालुक्यातील खुश्कीच्या मार्गाने अर्थात वनविभागाच्या हद्दीतून हे बिबटे येत आहेत. एक बिबट्या दिवसभरात 15 किलोमीटरचे अंतर पार करू शकतो. त्यामुळे बिबट्यांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बिबट्यांचा वावर व्यापून गेला आहे.
बारामती तालुक्यापाठोपाठ आता बिबट्या इंदापूर तालुक्याच्या रडारवर आहे. त्यामुळे भय इथले संपत नाही, अशी अवस्था बारामती आणि इंदापूर तालुक्याची झाली आहे. इंदापूर तालुक्यातील बागायती टापूत बिबट्यांचा वावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तीन गावे दहशतीच्या छायेत
ढेकळवाडी गावात बिबट्याच्या शेळी ठार झाली आहे. त्यामुळे काटेवाडी, कन्हेरी, ढेकळवाडी भागात फिरणारा बिबट्या हा एक नसून दोन असावेत, अशी चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. याला वनविभागाकडून दुजोरा मिळाला आहे. गुरूवारी (दि.23) सकाळी साडेसात वाजता बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार झाले. तर एक शेळी गंभीर जखमी झाली होती. त्याच पाठोपाठ रात्री नऊच्या सुमारास कण्हेरी येथील तानाजी साहेबराव देवकाते यांच्या दारातील बोकड बिबट्याने पळवून नेले होते. त्यानंतर ढेकळवाडी येथील अनंत दादासाहेब टकले यांच्या शेतातील गोठ्यामधील गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात शेळी जागीच ठार झाली आहे. आरडाओरडा झाल्याने शेळी सोडून बिबट्याने उसामध्ये धूम ठोकली.
बिबट्याचे संख्या एकापेक्षा अधिक आहे. त्यासोबत त्यांची पिल्ले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याला पकडणे जिकीरीचे होत आहे. तरीदेखील वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ढेकळवाडी येथे पिंजरा लावला आहे. दुसरा पिंजरा कन्हेरी भागात पिंजरा लावण्यासाठी मागणी केली आहे.
-राहुल काळे, अतिरिक्त वनअधिकारी, बारामती.