नगर – नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाला आदर्श करून जागतिक पातळीवर नेणाऱ्या पोपटराव पवार व देशी बियाणांचं जतन करून बियाणांची बॅंक स्थापन करणाऱ्या अकोल्याच्या मदर ऑफ सीड अर्थात बीजमाता राहिबाई पोपेरे यांना केंद्र सरकारच्या वतीने पदमश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
एकाच वेळी दोघांना हा सन्मान मिळण्याची नगर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरु करणाऱ्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील,ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पदमश्री तर दिवगंत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, जामखेडचे डॉ. रजनीकांत आरोळे,अण्णा हजारे यांना पदमविभूषण पुरस्कार मिळालेला आहे.
पोपटराव पवार यांनी गेल्या अनेक वर्षापासून हिवरे बाजारमध्ये आदर्श गाव योजनेची संकल्पना रूजवताना राज्यातही अनेक गावे विकसीत करत या संकल्पनेचा पाया विस्तृत केला.त्यांच्या या कार्याची दखल केवळ राज्यपातळीवर नव्हे तर देश व जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे. तर,संकरीत बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहिबाई पोपेरे यांनी अकोले तालुक्यात देशी आणि पारंपारिक बियाणांचे संकलन करत बियाणांची बॅंक तयार केली. दुर्मिळ झालेल्या देशी वाणांचे संवर्धन केले आहे.
मला जो पुरस्कार जाहीर झाला आहे, तो मी आता पर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेचा आहे. बायफ संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहचवता आले. या पुरस्काराने मला व माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. मी सर्वांची आभारी आहे. मी शाळा शिकले नाही परंतु निसर्गाच्या शाळेने मला खूप काही शिकवले आणि निर्सगाचे नीतिमूल्ये जपत यापुढेही कार्य करत राहीन.
राहिबाई पोपेरे सीड मदर