मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर वाढतच जात आहे. त्यात गुरुवारी दिवसभरात 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे.
राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज झालेल्या 152 मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 1 एप्रिल ते 8 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 117 मृत्यूपैकी मुंबई 87, मीरा भाईंदर 8, कल्याण डोंबिवली 7, सोलापूर 7, नवी मुंबई 4, नाशिक 3 आणि वसई विरार 1, अशी संख्या आहे.
राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड 19 निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 6,09317 नमुन्यांपैकी 97,648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत.