बरे होण्याचे प्रमाण 26.52 टक्के
नवी दिल्ली : भारतातील करोनाबाधितांची संख्या 38 हजारांच्या घरात पोहचली आहे. मात्र, 10 हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाल्याने देशाला मोठाच दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 26.52 टक्के इतके आहे. देशात करोना संसर्गामुळे आतापर्यंत 1 हजार 200 हून अधिक रुग्ण दगावले आहेत. महाराष्ट्रातील बाधित आणि बळींची संख्या देशात सर्वांधिक आहे. त्याखालोखाल गुजरातचा क्रमांक लागला आहे.
गुजरातमधील बाधितांची संख्या 5 हजारांजवळ जाऊन पोहचली आहे. त्या राज्यात 200 हून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. दिल्लीत 3 हजार 700 हून अधिक बाधित आहेत. त्याशिवाय, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेशात सुमारे 2 हजार 500 किंवा त्यापेक्षा अधिक रूग्णांना करोनाची लागण झाली आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगण या शेजारील राज्यांनी बाधितांच्या संख्येत याआधीच 1 हजारचा टप्पा ओलांडला आहे. भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये 111 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची मुदत 17 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.