कोलकाता – करोनामुळे देशात निर्माण झालेल्या बिकट आर्थिक स्थितीचा देशाच्या बॅंकिंग स्थितीवर दीर्घकालीन किंवा मध्यमकालीन नेमका काय परिणाम होणार आहे याचा अंदाज लागेनासा झाला आहे असे बॅकांच्याच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या संबंधात बोलताना एसबीआयच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यामुळे बॅंका सध्या केवळ अल्पकालिन धोरण कसे असावे याचाच विचार करीत आहेत.
सध्या तरी आम्ही फक्त आगामी दोन ते तीन तिमाहींच्या धोरणावरच विचार करीत आहोत असे त्यांनी सांगितले. देशातील लॉकडाऊनचा पुढील वर्षा दोन वर्षाच्या काळात नेमका काय परिणाम होणार आहे याचा अंदाज घेणे कोणालाच शक्य नाही असेही त्यांनी नमूद केले.
तथापी भारत हा एक तरूण देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था विकसनशील आहे त्यामुळे देशाचे आर्थिक चित्र वेगाने बदलेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बॅंकांनी इमर्जन्सी करोना क्रेडीट म्हणून लोकांना त्वेरेने खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडावी अशी लोकांची अपेक्षा असेल आणि ती योग्यच आहे असेही त्यांनी नमूद केले. करोनामुळे तीन महिन्यांचे हप्ते पुढे ढकलण्याची जी सुचना आरबीआयकडून बॅंकांना देण्यात आली आहे त्याचा देशातील उद्योग क्षेत्रातल्या 20 ते 25 टक्के लोकांनी लाभ घेतला आहे असेहीं त्यांनी यावेळी सांगितले.
अर्थात हप्ते भरणे लांबले असले तरी लोकांना त्याचे व्याज द्यावेच लागणार आहे. बॅंकांना रेपो दर आणि कॅश रिजर्व्ह रेशोतील सवलतींमुळे गरजूंना जादा आर्थिक निधी उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. त्यामुळे गरजूंना त्याचा लाभ देणे शक्य होणार आहे असेहीं त्यांनी सांगितले. कंपन्यांना देण्यात यायच्या खेळत्या भांडवलाच्या मर्यादेच्या नियमातून सूट देण्याची संधी बॅंकांना देण्यात आली आहे त्यामुळेही कंपन्यांना जादा खेळते भांडवल पुरवता येऊ शकेल असेही त्यांनी म्हटले आहे.