नगर -केंद्र व राज्याच्या आदेशानुसार करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात आणखी तीन दिवस म्हणजेच 3 मे पर्यंत कडक निर्बंध पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 30 एप्रिल पर्यत बंद करण्याबाबतचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, केंद्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हातील भाजीपाला बाजार 3 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व सेतू, महा ई-सेवा केंद्र, आधार केंद्र तसेच जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदविण्याचे कामकाज 3 मेपर्यंतच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, खासगी शाळा तसेच महाविद्यालये, अंगणवाड्या, कोचिंग क्लासेस, आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.