नवी दिल्ली – खोट्या कारणांसाठी “लॉकडाऊन’चा भंग करणाऱ्यांविरोधात आता भारतीय दंड संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची सूचना केंद्र सरकारने विविध राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना केली आहे.
या उपाय योजनांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 च्या कलम 51 ते 60 च्या तरतुदी तसेच “आयपीसी’च्या कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे 24 मार्च रोजी “लॉकडाऊन’ लागू करताना स्पष्ट करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
“लॉकडाऊन’च्या उल्लंघनासाठी होणाऱ्या संभाव्य कारवाईची माहिती सर्व नागरिकांपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचवली जाणार आहे. खोटी कारणे देऊन या लॉकडाऊनच्या उल्लंघनासाठी दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. आपत्तीकालीन परिस्थितीत पैसे अथवा उपलब्ध साधन सामुग्रीची अयोग्य हाताळणी करण्यामुळेही दोन वर्षांची शिक्षा आणि दंद अशी कारवाई केली जाऊ शकते, असेही भल्ला यांनी म्हटले आहे.