शेवटची मीटिंग संपवून रघुनंदन क्षणभर उभा राहिला. स्वतःच्या हाताने लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होताना त्याने पाहिला होता. पण काही घटनांनी आणि चुकीच्या निर्णयांनी हा वटवृक्ष आता कोसळू पाहत होता. स्वतःचा कारखाना बंद करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. अतिशय विमनस्क परिस्थिती झाली होती. राहता बंगला, कारखान्याची इमारत, दोनही गाड्या सर्व नवीन खरेदीदाराच्या ताब्यात देऊन, आता काही देणे राहिले नाही याची खात्री करून, तो मीटिंगमधून बाहेर पडला. नाही म्हणायला अगदी पूर्वी राहायचा ते दोन खोल्यांचे घर शाबूत होते. आता तिकडे परत राहायला जाणे अनिवार्य होते. तो सावकाश चालत इमारतीमधून बाहेर पडला आणि रिक्षाने घरी जाण्यास निघाला. मुले आणि रजनी त्याची वाटच पाहत होती. सर्व सामान आवरून तयार होते. ते चौघेजण पुन्हा जुन्या घराकडे निघाले.
आज या घरी येऊन देखील 6 महिने होत आले होते. रघुनंदनने नोकरी सुरू केली होती. मुले शहाणी होती. रंजनीने स्वतः छोटी नोकरी सुरू केली होती. पण या सहा महिन्यात एकाही नातेवाईकाने किंवा मित्राने साधी चौकशी सुद्धा केली नव्हती. आपल्याला त्याला मदत करावी लागेल. या कल्पनेने लोकांनी लांबच राहणे पसंत केले होते.
रघुनंदन आणि रजनी आठवत होते. बंगल्यावर मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणारे, दिवाळी साजरी करायला-होळी खेळायला येणारे, 31 डिसेंबर सेलिब्रेट करायला येणारे आणि काहीच नाही, तर सहज आलो म्हणून मुद्दाम येणारे सगेसोयरे आणि मित्र! किती मजा येत होती तेव्हा. आता कुठे गेले सगळे एकदम? शेवटी हेच खरे की, नात्यापेक्षा तुमचा पैसाच बोलत असतो. तुम्ही जोपर्यंत प्रकाशझोतात असता, तोपर्यंत सर्वजण तुमचे असतात. पण अडीअडणीला येणारे फार कमी. आपल्या कठीण परिस्थितीत जे आपल्याला मदत करतात, तेच खरे आपले मित्र आणि नातेवाईक असतात. पण दुर्दैवाने अशी माणसे फार कमी भेटतात.
आताच्या पिढीला शुक्रवारची कहाणी माहीतही नसेल. आपल्या गरीब बहिणीला भाऊ सहस्रभोजनातून घालवून देतो. कारण काय, तर तिच्याजवळ चांगले कपडे, दागिने नसतात. आणि पुढे तिची परिस्थिती बदलल्यावर मात्र तोच भाऊ तिला मोठ्या आग्रहाने जेवू घालू बघतो, तेव्हा बहीण म्हणते ते वाक्य फार मार्मिक आहे. बहीण म्हणते, “दादा, मी सहस्त्रभोजनाच्या दिवशीच पोटभर जेवले. आता मी माझ्या दागदागिन्यांना जेवू घालते.” सारंश काय, माणसे परिस्थिती पाहून वागतात. आपण मात्र आपले कान आणि डोळे उघडे ठेवावेत आणि स्वतःचा आत्मसन्मान जपावा.
“पैसा’ ही गोष्ट अशी आहे की जी नसली तर अडते आणि जास्त झाली तरी माणसाचे मन आणि बुद्धी यावर विजय मिळवते. तेव्हा जे आपल्याजवळ आहे त्यातच समाधानात राहू या.
आजच्या काळात नात्यात “पैसा’ या एकाच गोष्टींमुळे वितुष्ट येत आहे. तेव्हा निदान आपल्यापुरती तरी आपण नाती बळकट करूया आणि नात्यामध्ये “पैसा झाला मोठा’ यामुळे येणारा दुरावा आणि त्यामुळे येणारे दुःख टाळण्याच प्रयत्न करू या.
– आरती मोने