नवी दिल्ली -भाजपने लोकसभा निवडणूक लढवण्याची दिलेली ऑफर नाकारल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी केला. निवडणूक लढवण्याइतका पैसा माझ्याकडे नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
राज्यसभा सदस्य असणाऱ्या अनेक केंद्रीय मंत्र्यांना भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सीतारामन मात्र त्याला अपवाद ठरल्या आहेत.
साहजिकच, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांना लोकसभा निवडणूक लढवत नसल्याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आंध्रप्रदेश किंवा तामीळनाडूतून लढण्याचा पर्याय भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी माझ्यापुढे मांडला होता.
त्यावर जवळपास दहा दिवस मी विचार केला. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्याइतका पैसा माझ्याकडे नसल्याचे मी सांगितले. आंध्र की तामीळनाडू हा प्रश्नही माझ्यापुढे होताच. जिंकण्याची क्षमता याविषयी वापरले जाणारे विविध निकष हाही आणखी एक प्रश्न उभा ठाकला. तु
म्ही या समुदायाचे की त्या धर्माचे असे ते निकष. मला शक्य होईल असे न वाटल्याने मी नकार दर्शवला. सुदैवाने मी मांडलेली भूमिका स्वीकारण्यात आली, असे त्यांनी नमूद केले.
देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्याइतका पैसा का नाही, असा दुसरा प्रश्न सीतारामन यांना विचारण्यात आला. त्यावर त्या उत्तरल्या, सरकारी पैसा काही माझा नाही.
केवळ वेतन, उत्पन्न आणि बचत याबाबी माझ्या आहेत. स्वत: निवडणूक लढवत नसले तरी भाजपच्या इतर उमेदवारांचा प्रचार मी करणार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.