पश्चिम बंगाल – सिलीगुडीमध्ये एका वडिलांना 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन बसने 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याची घटना घडली आहे. रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने त्याने नाईलाजाने मुलाला बसने घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर ममता बॅनर्जी सरकारच्या ‘स्वास्थ्य साथी’ योजनेवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.
शनिवारी रात्री सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 5 महिन्यांच्या मुलाचा झाला होता. मागील 6 दिवसांपासून या मुलावर उपचार सुरू होते. यासाठी 16 हजार खर्च आला होता. मात्र बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी रुग्णवाहिका चालकाला मुलाचा मृतदेह कालियागंज येथील त्याच्या घरी नेण्याची विनंती केली होती.
मात्र चालकाने त्यांच्याकडे 8 हजार रुपये मागितले होते. रुग्णवाहिका चालकाला देण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसमधून कालियागंजला नेण्याचा निर्णय घेतला, असे मृत मुलाचे वडील आशिम देबशर्मा यांनी सांगितले.
102 योजनेअंतर्गत चालणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णांसाठी ही सुविधा मोफत आहे, मृतदेह मोफत नेण्याबाबत कोणताही नियम नसल्याचेही यावेळी आशिम यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी ते 200 किमी अंतरावर असलेल्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंजपर्यंत बसने प्रवास केला.
मृतदेहाबाबत त्याने बसमध्ये कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही, इतरांना याबाबत कळाले असते तर त्यांनी बसमधून उतरवले असते, अशी भीती आशिमला होती. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली जात आहे.