नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या कोटपुतली येथील विजय शंखनाद रॅलीत कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानातील जनता कायमच देशाच्या मजबुतीसाठी उभी राहीली आहे. जयपूरचा जलवा तर फ्रान्सचे राष्ट्रपती जेंव्हा येथे आले होते त्यावेळीच संपूर्ण जगाने पाहिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे राजकारण पुन्हा भागांत विभाजित झालेले दिसते आहे. एकीकडे राष्ट्र सर्वप्रथम असे मानणारी भारतीय जनता पार्टी आहे तर दुसरीकडे देशाला लूटण्याची संधी केंव्हा मिळते याची वाट पाहणारी कॉंग्रेस आहे. आज संपूर्ण देशाला आपला परिवार मानणारी भाजप एकीकडे आहे तर दुसरीकडे एका परिवाराला देशापेक्षा मोठी मानणारी कॉंग्रेस आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
आज संपूर्ण जगात भारताचा मान वाढवण्याचे काम भाजप करते आहे तर ते मात्र परदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याचे काम करतात. अशा देशविरोधी, परिवारवादी शक्तींच्या विरोधात राजस्थान नेहमीच उभा राहीला आहे. २०२४ ची यंदाची ही निवडणूक सामान्य निवडणूक नसून विकसित राजस्थान आणि विकसित भारत याचा संकल्प निवडणारी ही निवडणूक आहे. भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ही निवडणूक आहे. आत्मनिर्भर भारत आणि शेतकऱ्यांच्या समृध्दीचा हा संकल्प असल्याचे ते म्हणाले.
देशातील ही पहिली निवडणूक आहे की ज्यात कॉंग्रेसचे बडे नेते स्वत:च्या विजयाबाबत बोलत असल्याचे दिसून येत नाही. ते मौन आहेत. मात्र ते देशाला धमकावण्याचे काम करत आहेत. जर भाजप पुन्हा जिंकली तर ते देशात आग लावतील अशी भिती कॉंग्रेस घालते आहे. मात्र मोदी गेल्या दहा वर्षांपासून यांनी लावलेली आग विझवण्याचे काम करत आहेत असेही पंतप्रधानांनी नमूद केले.