श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे स्वत: लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांनी अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आझाद यांचा डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) हा पक्ष प्रथमच जनमताचा कौल आजमावणार आहे.
कॉंग्रेसच्या माध्यमातून प्रदीर्घ राजकीय वाटचाल केल्यानंतर आझाद यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये त्या पक्षाचा हात सोडला. त्यानंतर त्यांनी डीपीएपी या नव्या पक्षाची स्थापना केली. आता तो पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाला आहे.
स्वत: आझाद यांनी निवडणूक रिंगणात उडी घेण्याचे ठरवले आहे. ते १० वर्षांनंतर पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. याआधी २०१४ मध्ये त्यांनी उधमपूरमधून निवडणूक लढवली.
मात्र, भाजपचे उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना पराभूत केले. यावेळी निवडणूक लढवण्यासाठी आझाद यांनी दुसरा मतदारसंघ निवडला आहे.
त्या मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सने याआधी उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, इतर पक्षांनी अद्याप पत्ते खोललेले नाहीत. त्यामुळे तेथील लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.