नवी दिल्ली -करोना संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे कुठलीही योजना नाही. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या संकटापुढे शरणागती पत्करली आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सोडले.
देशातील करोनाबाधितांच्या संख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडल्याच्या दिवशी राहुल यांनी ट्विटरवरून मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य केले. देशातील नव्या भागांमध्ये करोनाचा वेगाने फैलाव होत आहे. मात्र, मोदी स्तब्ध आहेत.
करोना संकटाचा मुकाबला करण्याची त्यांची तयारी नाही, असे राहुल यांनी म्हटले. करोना फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा उपयोग झाला नसल्याची टीका कॉंग्रेसकडून वारंवार केली जात आहे. चीनच्या कुरापती, इंधन दरवाढीबरोबरच करोना संकटावरून मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न त्या पक्षाकडून सुरू आहेत.