आयसीसीचे समिती सदस्य स्टिव्ह रिचर्डसन करणार भारत सरकारकडे मागणी
दुबई – भारतासारख्या देशांमध्ये मॅचफिक्सिंग हे फौजदारी गुन्हा ठरवले गेले पाहिजे व त्यात दोषी आढळलेल्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे अधिकारी स्टिव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या जवळपास 22 वर्षांपासून म्हणजे जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हापासून ज्यांच्याबाबत संशय होता किंवा जे त्यात दोषी आढळले तेच आज राजरोसपणे फिरत आहेत. क्रिकेट व्यवस्थापन, प्रशिक्षण, समालोचन तसेच एखाद्या वाहिनीवर जाणकार समीक्षक म्हणून काम करताना दिसतात. म्हणजे त्यांच्याकडून किती मोठी चूक घडली आहे याचे कोणतेही गांभीर्य त्यांना नसल्याचेच स्पष्ट होते. एकूणच भारतातील ही परिस्थिती पाहता सरकारने मॅच फिक्सिंगला फौजदारी गुन्हा ठरवले तर त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांना मोकळीक मिळेल त्याचे हात बांधले जाणार नाहीत, असेही मत रिचर्डसन यांनी व्यक्त केले.
आयसीसीच्या बैठकीतही गेल्या काही वर्षांपासून अनेक सदस्य देशांचे अधिकारी ही मागणी करत आहेत. त्यात न्यूझीलंडने त्यांच्या सरकारकडे प्रस्ताव सादर करून केलेली मागणी मंजूर झाली व आज तिथे मॅचफिक्सिंग हा फौजदारी गुन्हा मानला जातो. हेच जगातील सर्व देशांमध्ये घडले तरच हे प्रकार रोखता येतील. भारतात तर क्रिकेटची लोकप्रियता पाहता हे असले प्रकार एखादी कीड लागावी तसे संपूर्ण भारतीय क्रिकेटविश्व पोखरत आहेत. याला वेळीच पायबंद घातला जावा असे वाटत असेल तर कायद्यात बदल करून मॅचफिक्सिंग, सट्टेबाजी, बुकींशी संपर्क किंवा तत्सम सर्व प्रकार फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेत आणले गेले तरच हे प्रकार करत असलेल्यांना जरब बसेल, असेही त्यांनी नमूद केले.
भारतातील कायदेप्रणाली पाहता कोणतेही कडक कायदे अस्तित्वातच नाहीत. 1999-2000 साली घडलेल्या प्रकरणानंतरही कोणी यापासून बोध घेतलेला नाही. अशा घटना घडतात किंवा काही कारवाई केली जाते त्यानंतर त्याला न्यायालयांमध्ये आव्हान दिले जाते. एखादा खेळाडू बंदीचा कालावधी संपल्यावर पुन्हा क्रिकेट व्यवस्थापनात किंवा अन्य पद्धतीने सक्रिय होते हे योग्य नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्याच्यावर तहहयात बंदीची कारवाई केली जावी व या सज्जनांच्या खेळापासून अशा व्यक्तींना कायमचे दूरच ठेवले गेले पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी अत्यंत कठोर झाली पाहिजे, व्यक्तीसापेक्ष होता कामा नये म्हणूनच मी भारत सरकारला मॅचफिक्सिंग फौजदारी गुन्हा ठरविण्याबाबत आवाहन करत आहे, असेही रिचर्डसन म्हणाले.