हर्षवर्धन; लॉक डाऊननंतर भारत अधिक वेगाने आगेकूच करेल
नवी दिल्ली : करोनाव्हायरसशी मुकाबला करताना भारताने वेळीच योग्य उपाययोजना केल्यामुळे भारताची परिस्थिती इतर देशापेक्षा कितीतरी चांगली आहे. विकसित देशात मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात भारताची मनुष्यहानी झालेली नाही. हे केवळ केंद्र आणि राज्य सरकारनी योग्य वेळी कडक उपाययोजना केल्यामुळे शक्य झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
याविषयावर निती आयोगाने आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये बोलताना हर्षवर्धन म्हणाले की केवळ केंद्र आणि राज्य सरकारनेच नाहीतर भारतातील कंपन्या, बॅंका आणि स्वयंसेवी संस्थांनी आपल्या परीने करोनाचा मुकाबला करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच करोनाचा संसर्ग इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कितीतरी कमी प्रमाणात झाला असल्याचे दिसून येते.
एकीकडे संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असतानाच दुसरीकडे कौन्सिल ऑफ ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी विभागांनी करोना वरील संशोधन चालू ठेवले आहे. देशात सध्या सहा प्रयोगशाळांमध्ये करोनावरील लस तयार करण्याचे काम विविध टप्प्यात आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक साधन सामग्रीची जमवाजमव अतिशय वेगात करण्यात आली आहे. देशातील विविध कंपन्या अशा प्रकारची उपकरणे पुरेशा प्रमाणात उत्पादित करीत आहेत.
चीनमध्ये करोना व्हायरस आढळल्यानंतर त्याची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आणि इतर देशांनी उपाययोजना करण्याअगोदरच भारताने यासंदर्भात उपाययोजना केल्या. विमानतळावर बाहेर देशातून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली. त्याचबरोबर वेळेचे गांभीर्य ओळखून परदेशातून येणारी पूर्ण विमानसेवा बंद करण्यात आली. नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असूनही आंतरराज्य बस सेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या.
त्यामुळे भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात करोना व्हायरसचा संसर्ग मर्यादित प्रमाणात झाला असे त्यांनी सांगितले. करोनावर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात दुरुस्ती करून कर्मचाऱ्यावर हल्ले करणाऱ्याना अधिक शिक्षेची तरतूद करण्यात आली. या सर्व उपाययोजना वेगात करण्यात आल्यामुळे भारतातील परिस्थिती बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र ही लढाई संपलेली नाही. किंबहुना आपण अर्धीच लढाई जिंकलेली आहे. काही आठवड्यांनंतर पूर्णपणे लॉक डाउन संपल्यानंतर देशातील सर्व उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी देशातील सर्वांना सांघिकपणे आणि समजूतदारपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक भांडवलाची जमवाजमव करावी लागणार आहे. भारत त्यात यशस्वी होईल आणि या वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये भारत इतर देशांपेक्षा वेगाने आगेकूच करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.