श्रीनगर – भारताने पाकिस्तानचे अमेरिकन बनावटीचे एफ 16 हे विमान पाडल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. पण हा दावा खोटा असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच म्हटले आहे. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन विमानांची मोजणी केली त्यावेळी सगळीच्यासगळी विमाने तेथे होती. एकही विमान पाडले गेलेले नाही असे असताना मोदींनी खोटी माहिती देऊन देशाची दिशाभूल का केली असा सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी येथील एकाजाहीर सभेत बोलताना केला.
ते म्हणाले की बालाकोट हल्ल्याविषयीही साशंकता आहे. कोण म्हणते तेथे 700 अतिरेकी मारले, कोण म्हणते 500 मारले कोण म्हणते 300 मारले आणि आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये मात्र तेथे कोणतीच प्राणहानी झाली नाहीं असे छापून येते, हा सारा काय मामला आहे असा सवाल त्यांनी केला आहे. भारत – पाकिस्तान संघर्षात आणि काश्मीरातील हिंसाचारात रोज कोणीना कोणी मरत आहे. अशा स्थितीत आपल्याला फार काळ राहता येणार नाही.
आता मोदींचे सरकार जाणार हे नक्की झाले असून केंद्रात जे कोणी सरकार येईल ते पाकिस्तानशी चर्चा करेल आणि जम्मू काश्मीर हा त्यात पहिला विषय असेल अशी ग्वाहीहीं त्यांनी यावेळी बोलताना दिली. केंद्र सरकार जम्मू काश्मीरला गुलामासारखे वागवत आहे. आठवड्यातून दोनदा या राज्यातील महामार्ग बंद ठेवले जातात आम्ही या गुलामीत का जगायचे असा सवालही त्यांनी केला. आम्ही 1947 साली येथील राजाला घालवले आहे. आता तुम्ही आमचे देव बनून राहु नका आणि आम्हाला रोज उठून धमकाऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.