नवी दिल्ली – भारतीय लष्कराचा उल्लेख मोदीजी की सेना असा केल्याच्या कारणावरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची निवडणूक आयोगाने त्यांना पत्र पाठवून कानउघडणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे आचार संहितेचा भंग होत असून लष्कराचे राजनितीकरण केले जात असल्याचा आक्षेप त्यांच्या विरोधात घेण्यात आला होता. त्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना प्रेमपत्र पाठवले आहे.
यापुढील काळात अधिक काळजी घेण्याचा सल्ला आयोगाने योगींना दिला आहे. त्याच प्रमाणे नीती आयोगाचे अध्यक्ष राजीवकुमार यांनी कॉंग्रेसच्या न्याय योजनेवर टीका केली होती. ही योजना व्यवहार्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते पण त्यांच्याकडे वैधानिक स्वरूपाचे पद असल्याने त्यांनी अशी राजकीय टीका करणे योग्य नाही असेही निवडणूक आयोगाने त्यांनाही समाजवले आहे. मोदी समर्थक मंत्री व अधिकारी आपली मर्यादा सोडून सर्रास आक्षेपार्ह विधाने करताना निवडणूक आचार संहितेचा भंग करीत आहेत पण त्यांच्या विरोधात कारवाई करताना निवडणूक आयोग का कचरत आहे असा सवाल कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे.