नवी दिल्ली – जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्याशी चर्चा केल्यानंतर पाच ट्रिलियन येनची (42 अब्ज अमेरिकन डॉलर्स) भारतात पाच वर्षात गुंतवणूक करण्याची घोषणा केली. तर मोडी यांनी अगामी पाच वर्षात जपान भारतात तीन लाख 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असे सांगितले.
नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे उभय नेत्यांची चर्चा झाली. यावेळी उभय देशांत सहा करार करण्यात आले. त्याशिवाय ईशान्य भारताच्या विकासासाठी लक्षणीय पुढाकार घेणार असल्याचे जपानने जाहीर केले. तत्पुर्वी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांबाबात सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्विट केले होते.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी 2014 मध्ये भारतात 3.5 ट्रिलियन येनची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. हा विक्रम नव्या पंतप्रधानांच्या घोषणेने मोडला आहे.
करोनाच्या साथीचा आणि त्याच्या परिणामांचा जग आजही मुकाबला करत आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत येण्यात अजूनही अडथळे आहेत. भौगोलिक-राजकीय घटनांनी नवी आव्हाने निर्माण केली आहेत. भारत आणि जपानच्या सखोल राजनैतिक संबंधामुळे इंडो – पॅसिफिक विभागातील शांतता, भरभराट आणि स्थैर्याला चालना मिळेल, असे मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी उभय देशांत सहा करार करण्यात आले. दोन्ही देशांनी स्वच्छ उर्जा भागिदारीची घोषणा यावेळी केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि जपान सुरक्षित, विश्वासार्ह आणि अंदाज बांधता येण्याजोग्या स्थीर उर्जा पुरवठ्याचे महत्त्व दोन्ही देशांना ठाऊक आहे.
मोदी आणि किशिदा यांच्यात रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणावरही चर्चा झाली. किशिदा म्हणाले, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन झाले आहे. सीमारेषेत कोणत्याही स्वरूपात एकतर्फी बदल करण्यास आमचा विरोध कायम राहील.