इंफाळ, – मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्या दोन नेत्यांनी शनिवारी पुन्हा दिल्ली गाठली. त्यामुळे त्या पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच असल्याचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीत 60 पैकी 32 जागा जिंकून भाजपने मणिपूरची सत्ता राखली. मात्र, कुणाला मुख्यमंत्री बनवायचे याविषयीचा निर्णय अद्याप पक्षाने घेतलेला नाही. प्रदेश भाजपमधील गटबाजीमुळे मुख्यमंत्र्याच्या नावावर एकमत होऊ शकले नसल्याचे समजते. मुख्यमंत्री म्हणून एन.बिरेन सिंह यांना सलग दुसरा कार्यकाळ मिळेल, अशी चर्चा 10 मार्चला जाहीर झालेल्या निकालानंतर होती.
मात्र, त्या पदाचे आणखी एक दावेदार असणाऱ्या बिस्वजीत सिंह यांच्याविषयीही पक्षात मोठी अनुकूलता असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मणिपूरचा पेच कायम राहिला आहे. तो सोडवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिरेन आणि बिस्वजीत यांना पाचारण केले. त्यानुसार त्या दोघांनी स्वतंत्र विमानांनी दिल्ली गाठली.
याआधीही त्यांनी दिल्लीवारी केली होती. आता बिरेन आणि बिस्वजीत यांच्याशी चर्चा करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.