नवी दिल्ली – वादग्रस्त ठरलेल्या कृषी कायद्यांविषयीच्या शंका दूर करण्यासाठी मोदी सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांशी संवाद साधला.
राजनाथ आणि तोमर यांनी मागील काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू केले आहे. ताज्या बैठकीत त्यांनी कृषी कायद्यांना समर्थन असणाऱ्या कृषीतज्ञांशी आणि उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
नंतर पत्रकारांशी बोलताना कृषीतज्ञ आणि उद्योगांच्या प्रतिनिधींनी नव्या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात सुधारणांचे नवे युग अवतरेल, असा विश्वास व्यक्त केला. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका होईल. शेतमालाला चांगली किंमत मिळण्यास हातभार लागेल.
अर्थात, शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांना कायद्यांबाबत योग्यप्रकारे माहिती दिली जायला हवी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. याआधी राजनाथ आणि तोमर यांनी काही शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या संघटनांशीही चर्चा केली.