पाटणा – देशातील करोना लसीकरण मोहिमेवरून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. देशात सध्या सुरू असलेल्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची तुलना त्यांनी 1996-1997 च्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी करत, ‘केंद्रातील मोदी सरकार पैसे घेऊनसुद्धा जनतेचे लसीकरण करू शकत नाही’ असा टोला त्यांनी लगावला.
1996-1997 मध्ये जेव्हा देशात समाजवादी विचारांचे सरकार होते, ज्याचा मी अध्यक्ष होतो, तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरण मोहिमेचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी आजसारखी जागरूक जनता व सोयीसुविधांचा अभाव असताना देखील आम्ही 07 डिसेंबर 1996 पर्यंत 11.74 कोटी तर 18 जानेवारी 1997 पर्यंत 12.73 कोटी बालकांचे पोलिओ लसीकरण केले होते. तो भारताचा विश्वविक्रम होता. त्यावेळी लोकांच्या मनामध्ये लसीबाबत शंकाकुशंका होत्या. मात्र, तरीदेखील राष्ट्रीय जनता दलाचा समावेश असलेल्या समाजवादी सरकारने येणाऱ्या पिढ्यांना पोलिओ आजाराचा सामना करावा लागणार नाही या दृढनिश्चयाच्या पाठबळावर ही मोहीम यशस्वी केली.
“मात्र देशातील सद्यपरिस्थिती पाहून दुःख होते. केंद्रातील विश्वगुरू सरकार पैसे घेऊनही आपल्या नागरिकांना लस उपलब्ध करून देऊ शकत नाही. मी पंतप्रधानांना विनंती करतो की, या जीवघेण्या महामारीपासून देशातील जनतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी देशव्यापी मोफत लसीकरण मोहिमेची घोषणा करावी.” असे आवाहन यादव यांनी केले
यावेळी बोलताना यादव यांनी, “राज्य व केंद्र सरकारला लसीची खरेदी करताना मोजावी लागणारी किंमत वेगवेगळी असू नये. विविध राज्य एकत्र आल्यानंतरच देश बनत असतो. लसीकरण ही केंद्र सरकारची जबाबदारी असून देशातील प्रत्येक नागरिकाचे टप्प्याटप्प्याने मोफत लसीकरण व्हायला हवे” अशी भूमिकादेखील मांडली.