पुणे – मोबाइल कंपन्या कर्जामुळे आधीच अडचणीत आल्या आहेत. त्याचबरोबर करोना व्हायरसमुळे या कंपन्यांना सध्याच्या परिस्थितीत सतत काम करावे लागणार आहे. मात्र, सध्याच्या काळात कॉल आणि डेटा वापराचे दर स्थिर ठेवणार असल्याचे मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी म्हटले आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून घडलेली एक सकारात्मक बाब म्हणजे पुढील तीन महिने कंपन्यांना कर्जावरील व्याजाचे हप्ते द्यावे लागणार नाहीत. आम्ही या सुविधेचा वापर करणार असल्याचे मोबाइल सेवा पुरवठादार यांची संघटना असलेल्या सीओएआयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले.
“आम्ही आर्थिक अडचणीत असल्यामुळे मोबाइल आणि डेटा दर वाढवणार होतो. मात्र, करोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत आम्ही कॉल किंवा डेटा दरामध्ये वाढ करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.