जिल्ह्यातील बंडखोर उमेदवार गळाला लागण्याचे संकेत; पक्ष सर्व जागा लढविणार
पुणे – लोकसभा निवडणुकीच्या वेळी “ट्रॅक’ सोडून “यार्डात’ स्थिरावलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे “रेल्वे इंजिन’ आता विधानसभा निवडणुकीत धावणार आहे. पक्षाने निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आणि निर्धार पाहून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीही इंजिनाला हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी प्रबळ इच्छुकांसाठी आणखी एक संधी निर्माण झाली आहे. आघाडी आणि युतीकडून डावलले जाणारे मातब्बरही मनसेच्या गोटात दाखल होऊ शकतात, यातून मनसेही विधानसभेत कडवे आव्हान उभे करून शकतो.
मनसेचे अध्यक्ष ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने विरोधी पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे घोडे जागा वाटपावरून अडले आहे. त्यातच बहुजन वंचित आघाडीसह अन्य पक्षांतील इच्छुकांची संख्याही अधिक आहे. याच कारणातून उमेदवारी मिळालीच नाही तर इंजिनाच्या चिन्हावर मनसेबरोबर धावायला अनेक जण तयार झाले आहेत. यामुळे कोणातही पक्ष आमच्या अमुक अन् तमुक जागा येणार, असा दावा करीत असला तरी मनसे त्या-त्या मतदारसंघात आव्हान निर्माण करून जागा जिंकुही शकतो. यातून विधानसभा निवडणुकीत मनसेही एक मोठा पक्ष म्हणून समोर येवू शकतो.
मनसेकडून मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक भागातील बहुतांश जागांवर मनसेकडून उमेदवार उभे करणार आहेत. पुणे शहरातील आठ तसेच जिल्ह्यातील 13 अशा 21 मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षांची अदलाबदल करून गेलेल्यांना जर त्या-त्या पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाहीच तर मनसेमध्ये येणाऱ्यांची संख्याही वाढू शकते, यातून राज्यातील 288 जागांवरही मनसेचे उमेदवार उभे असू शकतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. मनसेकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत (2014) निवडून आलेल्या जुन्नरमधील शरद सोनावणे यांच्या रूपातील मनसेच्या एकमेव आमदारानेही शिवसेनेत प्रवेश केला आहे; त्यानंतर मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होते. परंतु, सध्याची राजकीय स्थिती पाहता, कार्यकर्त्यांना नव्याने बळ देण्यासाठी मनसेने विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. पक्ष टिकवायचा असेल, तर निवडणूक लढलीच पाहिजे, अशी विनंती कार्यकर्त्यांकडूून ठाकरेंकडे केली जात होती. कार्यकर्त्यांची भावना जाणून घेत ठाकरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात सहमती दर्शविली आहे. यानुसार आता राज्यभरातील सर्व मतदार संघात तगडे उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
पुण्यातील सर्व मतदारसंघात आपल्याकडे इच्छुक उमेदवार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. मनसेची ताकद असलेल्या प्रामुख्याने कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर आणि कसबा या चार मतदारसंघात जोरदार लढा देण्याचे नियोजन आहे. पर्वती, वडगाव शेरी आणि कॅंटोन्मेंटमधूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे. तर, जिल्ह्यातील 21 मतदारसंघात उमेदवार उभे करण्यासंदर्भात मनसेकडून तयारी सुरू झाली आहे.
पक्षाचे नवनिर्माण होणार?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात “लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी राज्यभर झंझावाती सभा घेतल्या या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. विरोधी पक्षांच्या तुलनेत मनसेने नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला होता. राज यांच्या सभा वगळता कार्यकर्त्यांना कोणतेही काम नसल्याने त्यांना शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता दरम्यानच्या काळात आलेली मरगळ झटकून कार्यकर्ते पक्षाचे “नवनिर्माण’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत. निवडणूक लढण्याच्या निर्णयाने कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे.