मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शुक्रवारी मनसे नेत्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप यासंदर्भात मनसेने अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.
दरम्यान, राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सर्व विभाग प्रमुखांना इच्छुक उमेदवारांची यादी करण्याचे आदेश दिले होते. तसेच विधानसभेची तयारी कशी केली आहे, त्या प्रमाणे विजयी होण्याची शक्यता किती आहे ? याची चाचपणी करून माहिती तयार करण्यास सांगितली होती. त्यानुसार ही माहिती जमा करण्यात आली, आणि या माहितीच्या आधारे एकूण १०० जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सोलापूर, पंढरपूर, खेड, हिंगोली या ठिकाणी मनसेचा प्रभाव आहे. त्यामुळे या भागात आपले उमेदवार देण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या संदर्भात राज ठाकरे येत्या १ ते २ दिवसात आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.